Parents and children’s : ” सर, आपण शाळेत होतो तेंव्हा एवढ्या सोयीसुविधा होत्या का ? जुन्या वह्यांची कोरी पाने उपयोगात आणत होतो ,पुस्तकं तर कधीच नवी भेटली नाहीत . महागडे युनिफॉर्म, स्कूलबस, पिकनिक यातलं काहीच नव्हतं . तरीही आलो ना इथपर्यंत ? अन आपल्या मुलांचे एवढे लाड पुरवितो आपण तरीही हा पहा निकाल ? ”
दहावीचा निकाल लागल्यानंतर चिन्मयचे पप्पा फोनवरून बोलायचं थांबायला तयार नव्हते . ” सर, उद्या तुम्ही घरी आहात ना ? घेऊन येतो ह्याला . जरा तुमच्या भाषेत समजावून सांगा. आम्ही काय कष्ट करतो इकडे आणि आजकालच्या मुलांचं हे असं…..” मी मध्येच त्यांना थांबवत विचारलं, ” अहो, पण चिन्मयला गुण ……” मला वाक्य पूर्ण करू द्यायची त्यांची इच्छा नव्हतीच.
” सर, कसल्या आशेने एवढ्या सगळ्या तडजोडी करतो हो आपण ? समाजात दाखविण्यासाठी दुसरं आहे तरी काय आपल्यासारख्या सामान्य माणसाकडे ? मुलं हीच तर आपली ‘प्रॉपर्टी ‘ आहे भविष्याची. किती वाजता येऊ उद्या ? ”
” अहो, पण चिन्मयला गुण किती मिळाले, हे तर सांगा अगोदर . ” मी .
“काय सांगावं सर ….. मला तर आज ऑफिसलाही जाऊ नये असं वाटायला लागलंय… अहो, याला फक्त ब्याऐंशी टक्के …… अन आमच्या कार्यालयातला शिपाई आहे…. त्याच्या मुलीला चक्क पंच्याऐंशी….. कॉलनीत तर सोडाच पण ऑफिसमध्येही तोंड दाखवायला जागा नाही ठेवली याने…..सर, तुम्हीच सांगा आता….”
अलिकडेच दहावी – बारावीचे निकाल लागले. अनेक प्रवेश परीक्षांचेही निकाल येऊ लागले आहेत . हे निकाल लागल्यानंतर असे कितीतरी चिन्मय आपल्या पालकांच्या वैतागाचे निमित्त ठरलेले आहेत. मुलांनी अत्यंत मेहनतीने गुण मिळवूनही आम्ही पालक म्हणून पराभूत झाल्यासारखं अनेक चिन्मयच्या पप्पांना वाटत आहे .
पालकांनी आपल्या मुलांना मुलांपेक्षा प्रॉपर्टी समजायला सुरुवात केली, भौतिक सुविधांची पूर्तता करून देणे हाच पालकांना आपला पुरुषार्थ वाटू लागला . मग मुलांना त्यांच्या परीक्षेतील गुणांवरून जज करणे सुरु झाले . खरंच, मुलं आपली प्रॉपर्टी आहेत का ? पालक या नात्याने या प्रश्नाचे उत्तर आपल्या मनात ‘हो ‘ असेल तर निश्चितच आपल्याला आत्मपरीक्षणाची गरज आहे .
पालक म्हणून मुलांकडून चांगल्या गुणांची अपेक्षा ठेवणे गैर नाहीच . मुलांना कोणत्याही परीक्षेमध्ये मिळणारे गुण हे शाळा, शिक्षक, शिकविण्याच्या पद्धती, घरातील वातावरण, पालकांच्या जबाबदाऱ्या, मित्र, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांची आवड अशा अनेक घटकांचे एकत्रित परिणाम असतात. त्यामुळे कमी गुण मिळाले तर त्याचा दोष फक्त मुलांनाच का ? कोणत्याही परीक्षेतील गुणांची इतर मुलांसोबत तुलना करून आम्ही पालक मनःस्ताप करून घेतो आणि मुलांच्या आनंदात विरजण घालतो .
मुलांच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वाचा विचार न करता फक्त परीक्षेतील गुणांवरून त्यांच्याबद्दल असा ग्रह करून घेताना, मुलांच्या प्रगतीत आम्ही अडथळा तर निर्माण करत नाही ना ? असा प्रश्नही पालक म्हणून मी स्वतःला विचारला पाहिजे.
पालक या नात्याने मुलांना शिक्षणविषयक बाबींची शिस्त लावणे, आपले कर्तव्यच . पण या शिस्तिच्या नावाखाली आम्ही मुलांकडून खूप जास्त अपेक्षा करतो का ? प्रत्येक मुलामध्ये विशिष्ट क्षमता असतात, त्या विकसितही केल्या जाऊ शकतात . पालक म्हणून मी पहिल्यांदा मुलाची पूर्णपणे ओळख करून घेणे गरजेचे आहे . त्याच्या क्षमता विकसनालाही मर्यादा असतात, हेही पालक म्हणून मला कळले पाहिजे . माझी अपूर्ण राहिलेली स्वप्ने मुलांकडून पूर्ण करून घेण्याच्या नादात आम्ही पालक त्याच्या आवडी, क्षमता यांना दुर्लक्षित करतो आणि ही स्वप्नपूर्तीची अपेक्षा करताना मूल आपल्याला ‘प्रॉपर्टी ‘ वाटू लागते . त्यामध्ये आपण गुंतवणूक केली की, ठराविक काळानंतर आपल्याला चांगले ‘ रिटर्न्स ‘ मिळतील, पालक म्हणून असा लौकिक विचार आपण करतो . पण आपण केलेला तो दुराग्रह होता.हे जेव्हा कळते ,तेव्हा मात्र बराच उशिर झालेला असतो. मुलांना त्यांच्या नैसर्गिक आवडी – निवडी, क्षमता यांच्या जोरावर बहरू देणे हा त्यांचा अधिकार आहे आणि त्यासाठी मुलांना भक्कम पाठींबा, विधायक शिस्त, सकारात्मक दृष्टीकोन, संवादी पालकत्व इत्यादी गोष्टींच्या माध्यमातून बहरण्यास मदत करणे, हे पालक म्हणून आपले कर्तव्य समजूया !
एखादी परीक्षा, त्या परीक्षेमध्ये मिळालेले गुण एवढंच मुलांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी मत बनविण्यासाठी पुरेसे नसते. एक जबाबदार, विवेकी ‘ माणूस ‘ म्हणून समाजात ओळख निर्माण करण्यासाठी त्याने टाकलेले प्रत्येक पाऊल मुलाला समृद्ध करेल आणि पालक म्हणून आपल्याला निश्चित समाधान मिळवून देईल.
पालक म्हणून मुलांना ‘ प्रॉपर्टी ‘ च्या रुपात पाहण्यापेक्षा आपलं मूल’ राष्ट्राची संपत्ती ‘ म्हणून आपल्यातील पालकत्वाचा निश्चितच मोठा सन्मान करेल .
–अरविंद शिंगाडे (शिक्षक / समुपदेशक )
खामगाव जि . बुलढाणा
9423445668