Monsoon update : मान्सून सक्रिय
पुणे : मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्याने येत्या तीन दिवसांत पाऊस पुणे आणि मुंबईत सक्रिय होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.दरवर्षी मान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. मात्र यंदा ८ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर मान्सूनने प्रवास सुरू केला. दरवर्षी जून महिन्यात सात तारखेच्या आसपास मान्सून कोकणात दाखल होत असतो. मात्र यावर्षी तसे घडले नाही मान्सूनचे उशिराने ११ जून रोजी कोंकणात आगमन झाले होते. मान्सून देशातील कोकण, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग येथे पोहचला होता. त्यानंतर ३ ते ४ दिवसांत संपूर्ण राज्याला व्यापणाऱ्या चालीसाठी पोषक स्थिती आता निर्माण झाली आहे.
देशाच्या अन्य भागांत मान्सून
मान्सूनने सोमवारी (१९ जून) सायंकाळपर्यंत आगेकूच केलेली नव्हती. मात्र आता अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा कार्यरत झाला असल्याने पुढील वाटचाल सुरू होण्याचा अंदाज आहे. ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा फटका मान्सूनच्या वाटचालीला बसला होता.दरम्यान, देशाच्या अन्य भागांत मान्सूनने सोमवारी प्रगती केली. कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि सिक्कीमच्या उर्वरित भागात मान्सून दाखल झाला आहे.
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा
राज्यात २१ ते २४ जूनदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या अनेक भागांत मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भात काही भागात वातावरण उष्ण राहणार असून दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर त्यानंतर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. यादरम्यान विदर्भात सोसाट्याचा वारा वाहणार आहे. मंगळवारी राज्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद चंद्रपूरमध्ये ४२.२ अंश सेल्सिअस, तर सर्वात कमी तापमान महाबळेश्वरमध्ये १८.१ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.
पावसाचा पत्ता नसल्याने चिंतेत भर
जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदोज फोल ठरला असून मृग नक्षत्रात पाऊस न झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. कोरडवाह शेतीसाठी पेरणी पूर्व मशागत अंतीम टप्यात असून पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहे. शेतकरी शेती तयार करण्यात गुंतलेला असूनही पहिल्या मृग नक्षत्रात पाऊस नसल्याने व पावसाची शक्यता दिसत नसल्याने जून महिना कोरड़ा जातो की काय ?, या चिंतेत शेतकरी वर्गे आहे. परंतु, दुसरा पंधरवाडा लागला तरी पावसाचा पत्ता नसल्याने चिंतेत भर पडली आहे. शेतात पाणी शिरून शेत तुंबू नये, गेल्या वर्षी शेतांना तलावाचे स्वरूप आले होते, याची काळजी शेतकरी घेत आहेत. शेतातील बांध भरणीला वेग आला असून शेतात नांगरटी, वाही, काड्या वेचणे आदी कामे उरकून शेत पेरणीयोग्य करण्यात आली आहेत. पावसाचा विलंब असला तरी कामे उरकण्यावरशेतकरी भर देत आहेत. पावसाळ्याचे दिवसात उन्हाळ्या सारखे चटके बसत असल्याने मजुर शेतकरी कामाला सकाळी प्राधान्य देऊन उन होण्यापूर्वी कामे उरकून घेत आहेत.