Maharashtra Government Scheme : सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत असतात आज आपण अश्याच एका योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, अन्य कोणत्याही कारणामुळे होणाऱ्या अपघातामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतून लाभ देण्यात येतो.
प्रथम ३ वर्षे राबविली जाणार योजना
अपघातामुळे मृत्यू ओढावतो किंवा काहींना अपंगत्व येते. एखाद्या कुटुंबातील कमावती व्यक्ती जर अपघाताने मरण पावली तर त्या कुटुंबाच्या उत्पन्नाचे साधन राहत नाही आणि तात्यांच्यासमोर अडचणीचा डोंगर उभा राहत असतो. अशा अपघातग्रस्त शेतकरी, त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी आणि वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्यास आई-वडील, शेतकऱ्याची पती, पत्नी, मुलगा आणि अविवाहित मुलगी यापैकी कोणत्याही एका व्यक्ती १० ते ७५ वर्ष वयोगटातील एकूण २ जणांकरीता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. ही योजना महाराष्ट्र सरकारच्या वतीने ही योजना यावर्षी १९ एप्रिल २०२३ पासून अंमलात आणल्या जात असून गरजेनुसार सुरवातीला प्रथम ३ वर्षे राबविली जाणार आहे.
योजनेत किती मिळते अनुदान ?
सरकाराच्या योजनेत शेतकरी कुटुंबामधील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले १ सदस्यांमध्ये आई-वडील, शेतकऱ्याची पती, पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यांचा समावेश ग्राह्य मानला जाणार आहे. . कृषि गणनेनुसार निर्धारित केलेल्या वहितीधारक खातेदार शेतकरी आणि वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणताही १ सदस्य असे एकुण २ जणांकरीता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. यात अपघाताच्या बाबीमध्ये आर्थिक सहाय्यात अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रूपये, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास दोन लाख रूपये, अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास दोन लाख रूपये अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रूपये अनुदान देण्यात येणार आहे.
लाभ मिळण्यासाठी ग्राह्य बाबी
अपघातांमध्ये रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतूनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरुन पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचुदंश, नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या, जनावरांचा हल्ल्या, चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल, अन्य कोणताही अपघात, या अपघाताच्या बाबींचा समावेश आहेअपघातामध्ये नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपुर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करुन घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अंमली पदार्थाच्या अमलाखाली असताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, शरीरामध्ये झालेला रक्तस्त्राव, मोटार सायकल स्पर्धेत झालेला अपघात, युद्ध, सैन्यातील नोकरीत आलेलं मरण , जवळच्या लाभधारकाकडून हत्या असा काही घटनांचा समावेश ग्राह्य धरला जाणार नाही.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रे अआवश्यक आहेत. त्यासाठी रीतसर अर्जाचा नमुना तसेच शेतीचा सातबारा उतारा, मृत्यू झाल्याचा प्रमाणित दाखला, तुम्ही अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचे वारस आहात हे पटवून देणारा तलाठ्याकडील गांव नमुना नं. ६ क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, वारसदाराचे ओळखपत्र आधार कार्ड, पॅन कार्ड, बैंक पासबुक, निवडणूक ओळखपत्र, अपघातग्रस्ताचा वयाचा दाखला ज्यात जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र, प्रथम माहिती अहवाल, घटनास्थळ पंचनामा, पोलिस पाटील माहिती अहवाल, अपघाताच्या स्वरूपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे सादर करावी लागणार आहे.
किती दिवसात सादर करावा प्रस्ताव
किती दिवसात सादर करावा प्रस्ताव करावा याबाबत शेतकऱ्यांना माहिती नसते. त्यासाठी अपघातग्रस्त शेतकरी, शेतकऱ्यांचे वारसदारांनी सर्व निर्धारीत कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव संबंधीत तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे ३० दिवसाच्या आत सादर करावे लागणार आहे. यासाठी कृषि विभागाच्या सर्व क्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी यांचे मार्गदर्शन घ्यावे. योजनेंतर्गत वारसदाराची निवड अपघातग्रस्ताची पत्नी, अपघातग्रस्त स्त्रिचा पती, अपघातग्रस्ताची अविवाहित मुलगी, अपघातग्रस्ताची आई, अपघातग्रस्ताचा मुलगा, अपघातग्रस्ताचे वडील, अपघातग्रस्ताची सून, अन्य कायदेशीर वारसदार याप्रमाणे करण्यात येणार आहे.