शरद पवार कायदेशीर लढाई लढणार
Ajit Pawar : गेल्या साडेतीन वर्षांपासून सुरू असलेले शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील शीतयुद्ध अखेर उघड्यावर आले. थोरल्या पवार यांनी टाकलेली गुगली त्यांच्यावरच उलटली आणि ते ‘क्लीन बोल्ड’ झाले आहेत. महाराष्ट्रात पुतण्यांनी काकांना दगाफटका करण्याचे प्रकार नवीन नाहीत. जी चर्चा गेल्या काही वर्षांपासून होती, ती प्रत्यक्षात आली आहे. पक्ष फुटणे आणि फोडणे हे शरद पवार यांना ववीन नाही. आता ऐंशीव्या वर्षातही पक्षफुटीचे दुःख त्यांना सहन करावे लागले. पक्षफुटीनंतर कारवाई करावी लागते. ती कारवाई करण्याऐवजी वाट पाहण्याचे धोरण पवार यांनी घेतले आहे. आता पवार यांनी ही कारवाई करण्याचे पवार यांनी सूचित केले आहे; परंतु त्यासाठीही दोन दिवस वाट पाहण्याचे धोरण त्यांनी घेतल्याचे दिसते. त्याचे कारण पवार यांनी सांगितल्याप्रमाणे अजितदादा यांच्याबोबत गेलेले काही लोक संपर्कात आहेत, ते परत येण्याचे सूतोवाच पवार यांनी केले. त्याचबरोबर विधानसभेच्या अध्यक्षांकडून पक्षांतरबंदी कायद्यानुसार विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर कारवाई होण्याची शक्यता त्यांना वाटत नाही, तरीही पवार कायदेशीर लढाई लढणार आहेत.
पवार यांनी दिले मोदी यांना श्रेय
शरद पवार यांनी ज्यांना कार्याध्यक्ष केले, ते प्रफुल्ल पटेल अजितदादांच्य़ा मांडीला मांडी लावून बसले होते. ज्यांना सरचिटणीस केले, त्या सुनील तटकरे यांची कन्या आदिती या अजितदादांसोबत आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे नेतेच फक्त अजितदादांसोबत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस फुटीचे श्रेय पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले! राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तर हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप मोदी यांनी गेल्याच आठवड्यात भोपाळ येथे केला होता. आता तोच पक्ष आणि त्यातील नेते अहमदाबादच्या वॉशिंग पावडरने स्वच्छ झाले! अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासारख्या नेत्यांमागे ‘ईडी’चे शुक्लकाष्ठ होते. खा. संजय राऊत यांनी पूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस फुटीचा इशारा दिला होता. तो आता प्रत्यक्षात आला. अजितदादा यांनी बंड केल्याचे पवार यांनी मान्य केले. आता हे बंड मोडीत काढण्यात त्यांना फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे तर पवार यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही; किंबहुना विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवून अचानक बंड पुकारल्याचे त्यांनी सांगितले; परंतु राजकीय हवा कुठल्या दिशेने फिरते, हे अचूक सांगणारे शरद पवार अजितदादांच्या बंडाबाबत इतके गाफील कसे राहिले, की आता उतारवयात भाजपला उघड साथ देता येत नसल्याने त्यांची या बंडाला मूक साथ आहे, हे यथावकाश कळेल.
अजितदादांचा पक्षावर दावा
पवार यांचे स्वीय सहायक राहिलेले दिलीप वळसे पाटील कसे गेले, हे कोडे अनेकांना पडले आहे. अडचणीच्या काळातही छगन भुजबळ यांच्या पाठिशी शरद पवार-खा. सुप्रिया सुळे उभे राहिले. त्यांना विविधे मिळूनही भुजबळ अजितदादा यांच्यासोबत गेले. पक्षातील बंड पवार यांना नवीन नाही. अजितदादा यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत असलेली कुचंबणा, त्यांना जाणीवपूर्व बाजूला ठेवणे आणि अजितदादांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी अप्रत्यक्षपणे थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपयशाला शरद पवार यांनाच जबाबदार धरणे हे द्वंद्व आता संपले आहे. अजितदादांनी सगळ्या पक्षावरच दावा केला आहे. त्यावर शरद पवार यांनी फारसे भाष्य केले नसले, तरी पुन्हा पक्षबांधणीसाठी उद्याच बाहेर पडण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. १९८० च्या निवडणुकीअगोदर पवार यांच्या साठ आमदारांपैकी ५४ त्यांना सोडून गेले. पाच आमदारांचा नेता ते राहिले. त्यानंतर महाराष्ट्र पिंजून काढून ६९ आमदार त्यांनी निवडून आणले. सोडून गेलेल्यापैकी पन्नासहून अधिक पराभूत झाले.
विरोधी पक्ष नेतेपद आता काँग्रेसकडे
आताही जनतेवर विश्वास असून, पक्ष पुन्हा तरुणांतून पक्ष उभा करण्याचा निर्धार त्यांनी केला असला, तरी १९८० मध्ये पवार यांचे असलेले तरुण वय आणि आताचे त्यांचे वय, त्यामुळे आलेल्या मर्यादा यामुळे पक्ष वाढतो, की संपतो हे समजण्यासाठी अजून एक-दीड वर्ष प्रतीक्षा करावी लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे आणि फुटीर गटाने भाजपची तळी उचलल्याने त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीर गटाला तात्पुरता होईल. काँग्रेसला मात्र याचा अप्रत्यक्ष फायदा होईल. पवार यांनी महाविकास आघाडीसोबत राहण्याचा आणि देशपातळीवर मोदी यांच्याविरोधात आघाडी तयार करण्याचा निर्धार कायम असला, तरी त्यांचाच पक्ष फुटल्याने देशभरातील त्यांचे राजकीय वजन कायम राहील का, याबाबत शंका आहे. अजित पवार यांनी पाचव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली, तरी मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न आता स्वप्नच राहण्याची शक्यता आहे. अजितदादांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाले आहेत. राज्यात सत्तांतरानंतर गेल्या वर्षापासून मंत्रिमंडळाचा शपथविधी रखडला होता. आता तो झाला असला, तरी भाजप आणि शिवसेनेचे जे नेते मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून होते, त्यांची मात्र निराशा झाली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड केली असली, तरी पक्षफुटीमुळे हे नेतेपद आता काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे.
अजित पवार होते नाराज ?
अजित पवारांना ३५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपने टाकलेल्या फाशांत अजित पवार अडकले. अजितदादांनी पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. खा. सुप्रिया सुळे यांनी ही इच्छा पूर्ण होईल, असे सांगितले होते. पवार यांनी सहा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक बोलवून त्यात निर्णय घेण्याचे सूतोवाच केले होते; परंतु गेल्या साडेतीन वर्षांत खोलवर झालेल्या जखमा चिघळून त्याचे गँगरिंग झाल्याने बैठकीची वाट न पाहता अजितदादांनी पक्षफुटीची शस्त्रक्रिया कुणालाही काही कळण्याच्या आत सर्वांना संमोहित करून केली. अजित पवार हे गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज होते. ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यापूर्वीही अजित पवारांनी एकदा पहाटेचा शपथविधी करत भाजपसोबत सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला होता; मात्र तो यशस्वी होऊ शकला नव्हता.
दोन्ही बाजूने अस्वस्थता
पवार यांनी हे बंड मोडून काढल्यानंतर अजितदादा नाराज असताना पवार यांनी आपल्या ‘लोक माझे सांगाती’ भाग दोन या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात अचानक आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. पवार यांच्या या घोषणेमुळे अजितदादांची तलवार मॅन झाली; परंतु त्यांनी ती फक्त दोन महिन्यांसाठी झाली होती. अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जादा निधी दिल्याचा आरोप करून शिवसेना फोडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता अजितदादा यांचे स्वागत करण्याची वेळ आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनी दिनी शरद पवार यांनी खा. सुळे यांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्षपद देण्यात आले. खा. सुळे यांनी देशाचे आणि अजित पवार यांनी राज्याचे राजकारण करायचे असे ठरले असताना शरद पवार यांनी सुळे यांच्याकडे राज्याची महत्त्वाची जबाबदारी दिली. त्यातच गेल्या आठवड्यात झालेल्या दिल्लीतील बैठकीत पवार, पटेल आणि सुळे यांची छायाचित्रे होती; परंतु अजितदादांचे नव्हते. या उपेक्षेने त्यांनी कदाचित पक्षात फूट पाडून आपणच राष्ट्रवादी काँग्रेसचे खरे ताकदवान नेते असल्याचे दाखवून दिले. Ajit Pawar यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीत जशी अस्वस्थता आहे, तशीच अस्वस्थता शिंदे-भाजप गटातही आहे. काही दिवसांनी ही अस्वस्थता आणखी व्यक्त होईल.