भाजपाची काय असेल खेळी ?
Bihar Political News : बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी (JitanRam Manjhi) यांचे पुत्र संतोष मांझी (Santosh Manjhi) यांनी अनुसूचित जाती, जमाती कल्याण मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. २३ जून रोजी पाटणा येथे विरोधी एकजुटीच्या नावाखाली मोठी सभा होत असतानाच त्यांनी हे पाऊल उचलण्यात आले आहे. अर्थात त्यात काही अनपेक्षित नाही. मांझी यांना भाजपने गळाला लावण्याची खेळी खेळली. तिला यश येताना दिसत आहे. भाजपला यानिमित्ताने एक नवा मित्र मिळाला असला, तरी ते संयुक्त जनता दल किंवा लोकजनशक्ती पक्षाची जागा भरून काढतील, अशी स्थिती नक्कीच नाही. मांझी यांच्या पक्षाची ताकद बिहारच्या राजकारणात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही आमदार निवडून आणण्याची ताकद नाही; परंतु पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे साहजिकच महाआघाडीतील कोणताही पक्ष आपल्या जागेचा सौदा करण्याचा प्रयत्न करेल. अलीकडच्या काही महिन्यांत मांझी यांना महाआघाडीत एकत्र राहणे योग्य वाटत नव्हते. त्यांना आघाडीतून बाहेर पडायचेच होते. ते निमित्ताचा शोध घेत होते. त्यांच्या अनेक विधानामुळे मुख्यमंत्रीही अडचणीत आले. त्यामुळे हे अवघड जागेचे दुखणे आपोआप बरे होत असेल, तर ते बरेच आहे, असे महाआघाडीला वाटत होते. बिहारमध्ये दारूबंदी कायदा लागू आहे; पण या कायद्याविरोधात कोणी सर्वात जास्त आवाज उठवला असेल तर तो जीतनराम मांझी. सरकारमध्ये असताना ही मांझी या दारूबंदीमुळे गरिबांना जास्त त्रास होत असल्याचे वारंवार सांगितले. दारू पिणारे बडे लोक पकडले जात नाहीत. गरीब लोक त्यात अडकतात. दारूबंदी अयशस्वी झाली आहे, असे त्यांचे म्हणणे होते. बिहारमध्ये खुलेआम दारू विक्री करण्यास कायद्याने परवानगी नाही; परंतु जिथे गरज असेल तिथे दारू मिळते. यामध्ये चार लाखांहून अधिक लोक खटल्यात गुंतलेले आहेत किंवा तुरुंगात आहेत. नितीश कुमार यांना त्यामुळे अस्वस्थ वाटायचे. एकीकडे सरकारविरोधात बोलायचे आणि दुसरीकडे संयुक्त जनता दलासोबत राहण्याची भाषा करायची, नितीशकुमार यांच्या नेतृत्व कौशल्याचे कौतुक करायचे यामुळे महाआघाडीतही अस्वस्थता होती. महाआघाडीत राहण्याची ते शपथ घेत होते; परंतु दुसरीकडे राजकारणात शपथेला महत्त्व नसते असेही ते सांगत होते. आमच्या पक्षाकडे दुर्लक्ष होत असताना कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आम्ही दुसरा मार्ग स्वीकारू शकतो, असा इशारा ते देत होते. गेल्या काही दिवसांत त्यांनी तीन-चार आमदारांसह त्यांनी नितीशकुमार (CM Nitish Kumar) यांची भेट घेतली होती. त्यातच मुख्यमंत्र्यांनी मांझी यांना त्यांचा पक्ष ‘हिंदुस्तान अवामी मोर्चा’ संयुक्त जनता दलात विलीन करण्याचा सल्ला दिला होता.
बिहारमधील राजकीय स्थिती बदलतेय
ज्या नितीशकुमार यांनी जीतन राम मांझी यांना मुख्यमंत्री केले. त्याआधीच्या लोकसभा निवडणुकीत मांझी उमेदवार होते. त्यांना अनामत रक्कम ही वाचविता आली नव्हती. संयुक्त जनता दलाच्या सरकारमध्ये सहभागी होऊन सरकारविरोधात पवित्रा घ्यायचा आणि सरकारचे फायदे यामुळेच नितीश कुमार यांनी आता मांझी यांना लोकसभा निवडणूक लढवायची असेल तर आधी पक्ष विलीन करा, अशी अट घातली. विलीनीकरणानंतर आपण विचार करू, असे त्यांनी सांगितले;परंतु मांझी यांचा त्यांच्यावर विश्वास नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे महाआघाडीचे सरकार स्थापन झाले, तेव्हा मांझी यांना दोन पदे हवी होती; मात्र त्यांच्या पक्षाचे चार आमदार असूनही त्यांच्या मुलाला मंत्रिपद दिले होते. त्यांच्या मुलाकडे अनुसूचित जाती, जमाती कल्याण विभागाव्यतिरिक्त जलसंपदा विभाग होता; परंतु तो काढून घेण्यात आला. याचा त्यांना राग होता. मांझी आधीच संतापले होते आणि त्यांच्या वक्तव्याने सरकार दुखावले जात होते. २३ तारखेच्या बैठकीपूर्वी आम्हीही पक्ष आहोत; मात्र नितीश कुमार यांनी जीतन राम मांझी यांना निमंत्रण दिले नाही. त्यामुळे संतोष सुमन यांनी नितीश मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला; पण महाआघाडीपासून फारकत घेण्याबाबत ते काहीही बोललेले नाही. बिहारमध्ये राजकारणाचे दोनच प्रवाह आहेत. एका बाजूला नितीश आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय जनता दल. अशा परिस्थितीत त्यांना राष्ट्रीय जनता दल किंवा भाजप आघाडी असे दोन पर्याय होते; परंतु त्यांचा कल भाजपकडे दिसतो. संतोष कुमार यांचे विधान परिषदेचे सदस्यत्व ६ मे २०२४ पर्यंत आहे. या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला अजून ८-९ महिन्यांचा विलंब आहे; मात्र हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे अध्यक्ष संतोष सुमन मांझी यांनी बिहारमध्ये मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील स्थिती झपाट्याने बदलू लागली आहे.
मांझी महाआघाडीतून बाहेर
मांझी यांच्या ‘हम’ पक्षा महाआघाडीतून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दलाच्या महाआघाडीत सहा पक्ष उरले आहेत. दुसरीकडे, जो राजकीय देखावा तयार होत आहे. त्यानुसार भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत ही सहा पक्ष रिंगणात उतरणार आहेत. म्हणजे दोन्ही आघाड्या प्रत्येकी सहा पक्षांची टीम तयार करून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील.कालपर्यंत नितीश कुमार यांच्या महाआघाडी सरकारमध्ये सात पक्ष होते. संतोष सुमन यांच्या राजीनाम्यानंतर आता सहा पक्ष उरले आहेत. नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस आता महाआघाडीत सरकार चालवत आहेत. या तीन पक्षांच्या सरकारला तीन डावे पक्ष बाहेरून पाठिंबा देत आहेत, त्यात सीताराम येचुरी यांचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष, डी राजा यांचा पक्ष दीपंकर भट्टाचार्य यांचा पक्ष सरकारला पाठिंबा देत आहे. विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी नितीश यांच्या प्रचारात हे सर्व पक्ष एकत्र असून त्यांचे नेते २३ जून रोजी पाटण्यातील एकता सभेत सहभागी होण्यासाठी येत आहेत. महाआघाडीचा भाग असतानाही मांझी यांच्या पक्षाला या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी आहे. त्यात दोन दोन प्रमुख पक्ष आहेत. भाजप आणि राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष आहे; पण २०२४ च्या निवडणुकीपूर्वी भाजपच्या गटात आणखी चार पक्ष सामील होतील. भाजपमध्ये सामील होणाऱ्या पक्षांमध्ये चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष (रामविलास गट), उपेंद्र कुशवाह यांचा आरएलजेडी, मुकेश साहनी यांचा व्हीआयपी आणि मांझी यांचा एचएएम यांचा समावेश आहे. २०२४ चे निवडणूक समीकरण मागील तीन लोकसभा निवडणुकांपेक्षा पूर्णपणे वेगळे असणार आहे.
भाजपचा खेळ बिघडवण्याचा प्रयत्न?
२००९ मध्ये संयुक्त जनता दल आणि भाजप एकत्र लढले आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३२ जागा जिंकल्या. त्यात संयुक्त जनता दलाने २० आणि भाजपने १२ जागा जिंकल्या. त्या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल आणि लोकजनशक्ती पक्ष एकत्र लढले; राष्ट्रीय जनता दलाला फक्त चार जागा जिंकता आल्या. उर्वरित चार जागांवर काँग्रेसने दोन ठिकाणी तर अपक्षांनी दोन ठिकाणी बाजी मारली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप, संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दल स्वतंत्रपणे लढले तेव्हा संयुक्त जनता दल दोन आणि राष्ट्रीय जनता दल चार जागा जिंकू शकले. या निवडणुकीत भाजपप्रणीत आघाडीला ३१ जागा मिळाल्या, त्यात भाजपला २२, लोकजनशक्ती पक्षाला सहा आणि आरएलएसपीला तीन जागा होत्या. राष्ट्रीय जनता दलाला चार, काँग्रेसला दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळाली होती. संयुक्त जनता दलाने डाव्या पक्षांशी लढत दिली आणि फक्त दोन जागा जिंकता आल्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत संयुक्त जनता दल आणि भाजप पुन्हा एकत्र आले. त्यांच्यासोबत लोकजनशक्ती पक्षही होता. या वेळी भाजपप्रणीत आघाडीने राज्यातील ४० पैकी ३९ जागा जिंकल्या. भाजपने १७ जागा लढवल्या, १७ जिंकल्या. संयुक्त जनता दलाने १७ लढवल्या. १६ जिंकल्या. लोकजनशक्ती पक्षाने सहा जागा लढवून सहा जागा जिंकल्या. विरोधी पक्षात काँग्रेसला केवळ एक जागा जिंकता आली. २०२४ च्या समीकरणात मोदी यांच्याकडून चिराग पासवान, पशुपती पारस, उपेंद्र कुशवाह, मुकेश साहनी आणि जीतन राम मांझी बिहारच्या खेळपट्टीवर खेळताना दिसणार आहेत. नितीश कुमार, तेजस्वी यादव, राहुल गांधी, सीताराम येचुरी, डी राजा आणि दीपंकर भट्टाचार्य महाआघाडीतून भाजपचा खेळ बिघडवण्याचा प्रयत्न करताना दिसतील.