Millets in marathi, Types of millets, Millets in marathi
बाजरी १९६० पर्यंत भारताचे मुख्य अन्न
Millets : २०१३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर भरड धान्य बाजरीचे वर्ष आहे. बाजरीला अनेकदा ‘सुपरफूड’ म्हणून संबोधले जाते. प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध असलेले हे धान्य शतकानुशतके देशातील बहुतांश राज्यांमध्ये उत्कृष्ट पौष्टिक मूल्यामुळे पारंपरिक अन्न म्हणून लोकप्रिय आहे. आज सरकारसुद्धा भरड धान्य उत्पादन करण्यावर भर देत आहे. आशियातील ८० टक्के उत्पादन आणि जागतिक उत्पादनात २० टक्के वाटा भारताचा असून बाजरीचा प्रमुख उत्पादक आहे. हे उल्लेखनीय आहे, की बाजरी १९६० पर्यंत भारताचे मुख्य अन्न होते; परंतु हरित क्रांतीच्या नंतर तांदूळ आणि गव्हाच्या उच्च उत्पादनाच्या वाणांच्या आगमनादरम्यान, लोक बाजरी खाण्यास विसरले. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या मते, १९६५- ७० पर्यंत, भारतातील एकूण अन्नपदार्थांमध्ये बाजरीचा वाटा २० टक्के होता, जो आता फक्त ६ टक्क्यांवर आला आहे.
पोषणासाठी बाजरीचे योगदान
केंद्र सरकार किंवा राज्य सरकारे सलग ५० वर्षे बाजरीकडे दुर्लक्ष का करत राहिले, हा प्रश्न आहे. अन्न सुरक्षा आणि पोषणासाठी बाजरीचे योगदान आता का मान्य केले जात आहे? आणि असे असूनही, बाजरी हा कोणत्याही परिस्थितीत गहू आणि तांदळासारखा मुख्य आहार असू शकत नाही, हे लक्षात घेण्यासारखे असून बाजरीमध्ये गॉइट्रोजेन्स देखील असतात जे आयोडीनच्या शोषणात व्यत्यय आणू शकतात. याचे जास्त सेवन केल्याने थायरॉईड आणि गोइटरची समस्या उद्भवते. त्यामुळे बाजरी दीर्घकाळापासून बाजूला पडण्याचे हेच कारण असू शकते.सध्याच्या काळात बाजरीचे उत्पादन आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरित केले जात आहे. हैदराबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिल्ट्स रिसर्चला धोरणे, कार्यान्वयन, दळणवळणाची देखरेख करण्यासाठी नोडल संस्था बनवण्यात आले आहे. ग्राउंड लेव्हलवर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सहा टास्क फोर्स तयार करण्यात पुरवठा वाढवण्याच्या योजनांसह विविध राज्यांतील तज्ज्ञ, पोषणतज्ज्ञ आणि शेतकरी यांच्याशी सल्लामसलत करण्यात आली आहे.
लोकांना भरडधान्यांपासून दूर केले ?
गेल्या शतकात अधिक अन्नधान्य निर्माण करण्यासाठी विकसित केलेली शेती आणि सिंचनाची पद्धत आज जलसंकट आणि नापीक जमिनीच्या रूपाने दिसून येत आहे. आता केवळ एक किलो गव्हाच्या पेरणीसाठी ९०० लिटर पाणी वापरले जाते. एक किलो भाजीपाला उत्पादनांसाठी ५०० लिटर पाणी आणि एक किलो तांदूळ पिकवण्यासाठी किमान २,५०० लिटर पाणी लागते. भारतीय राज्यघटनेतील राज्य यादीतील कृषी हा विषय आहे. मग अन्नधान्याबाबत एवढे अज्ञान का ? अन्नधान्याबाबत राज्य सरकारे दीर्घकाळ गाफील राहिली. विशेषतः ज्या राज्यामध्ये ज्वारी बाजरी-मका वगैरे पिकवण्याची प्रथा होती, तेथील लोकांच्या पारंपरिक खाद्य सवयींचा आदर केला जात नव्हता. मोह, तेंदू, चारोळी, बांबू यांसारख्या वनोपजांच्या संकलनावर अवलंबून असलेली ग्रामीण लोकसंख्या आणि आदिवासी जे शतकानुशतके खात आहेत, त्यांच्या उत्पादनाबाबत वैज्ञानिक पद्धतींबाबत कधीच चर्चा झाली नाही. दुष्काळ-महामारी इत्यादी नैसर्गिक आपत्तींमध्ये सरकारांनी त्या लोकांना बाजरी-मका, मोह यासारख्या भरडधान्यांपासून दूर केले. राजस्थान, कर्नाटक आणि महाराष्ट्रासारख्या दुर्गम भागातही, जिथे बाजरीचे भरघोस पीक होते, सरकारी पातळीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या दुकानांतून गहू पुरवला जात होता. हरित क्रांतीनंतर, जेव्हा गव्हाच्या मुबलक साठवणुकीचे युग सुरू झाले, तेव्हा हे भरड धान्य ‘कामासाठी धान्य’ आणि राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रमात क्वचितच वितरित केले गेले. १९७० पर्यंत शेतकरी गव्हाच्या विक्रीतून श्रीमंत असल्याने भरड धान्य मागासलेपणाचे आणि गरिबीचे प्रतीक मानले जात असे.
Millets : बाजरीमध्ये अनेक पोषक घटक
बाजरीच्या उत्पादनात राजस्थान आघाडीवरआहे, तर कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर महाराष्ट्र. चौथ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आणि पाचव्या क्रमांकावर हरियाणा आहे; पण या राज्यांतील कुपोषणाची आकडेवारी पाहा. राजस्थानमध्ये कुपोषणाची पातळी २७.६ टक्के, कर्नाटकात ३२.९ टक्के, महाराष्ट्रात ३६.१ टक्के, उत्तर प्रदेशमध्ये १ ३२.१ टक्के आणि हरियाणामध्ये २१.५ टक्के आहे. या राज्यांतील अंगणवाड्यांमध्ये बाजरी दिली जात होती की मातृत्व सहयोग योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतून गर्भवती महिलांना दिल्या जाणाऱ्या – धान्यात ? बाजरीला लोहाचा उत्कृष्ट स्रोत म्हणून ओळखले जाते, जे हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यास मदत करते. त्यात फायबर, अँटिऑक्सिडंट्स, लोह, जस्त, मॅग्नेशियम आणि बी जीवनसत्त्वे देखील भरपूर असतात.गहू आणि तांदूळ यांसारख्या भारतातील मुख्य तृणधान्य पिकांच्या तुलनेत बाजरी खूप चांगली आहे. कार्बोहायड्रेट्सच्या बाबतीत, ते जवळजवळ गहू आणि तांदूळ सारखेच आहे आणि प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे. असे असले तरी बाजरीचा अवलंब करणे योग्य आहे, पण ते बिवेकबुद्धीने स्वीकारावे लागेल. खरं तर, रोगांवर आराम देणाऱ्या काही धान्यांमध्ये बाजरी सर्वात वर आहे. त्याच्या लागवडीला चालना देण्यासाठी आणि मुख्य अन्नधान्य म्हणून त्याचा समावेश करण्याचा उपक्रम हवामान बदलाच्या युगात विवेकपूर्ण आहे. नव्या खाद्यसंस्कृतीकडे वाटचाल करण्यासाठी केंद्र सरकारचा हा उपक्रम, आहे, त्यामुळे बाजरीला (Millets)आपल्या आहारात सामावून घेणे आवश्यक आहे.
– विकास मेश्राम, मु.पो., झरपडा, ता. अर्जुनी मोरगाव, जिल्हा गोंदिया